महाड ः प्रतिनिधी
दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील स्थितीची मंगळवारी (दि. 27) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलारही उपस्थित होते, तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी तळीयेत हजर होते. संपूर्ण तळीये गाव दरडीखाली गाडले गेलेले पाहून राज्यपाल कोशारी व्यथित झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. ते म्हणाले, ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. दरडग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काम करतील. तळीये गावाची पाहणी केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी हे आमदार शेलार यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आणि त्यांनी चिपळूण आणि खेड तालुक्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
Check Also
पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल
युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper