Breaking News

सुडकोळी येथील बांधबंदिस्ती उद्ध्वस्त

खाडीलगतच्या भातशेतीचे नुकसान

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील सुडकोळी ग्रामपंचायत हद्दीत नवखार येथील समुद्रखाडीलगतची बांधबंदिस्ती डागडुजी नसल्याने उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे समुद्रखाडीचे पाणी घुसून भातशेतीचे अतोनात नुकसान आहे.

दरवर्षीच अशा प्रकारे येथील शेतकर्‍यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने याबाबत ठोस भूमिका घेऊन बंधार्‍याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी सुडकोळी ग्रामपंचायत सदस्या रूपाली पाटील यांनी केली आहे.

सुडकोळी ग्रामपंचायत हद्दीत नवखार येथे समुद्र खाडीलगत सुमारे 45 हेक्टर शेतजमीन आहे. या शेतजमिनीतून मिळणार्‍या उत्पन्नावर येथील शेतकरी उदरनिर्वाह करतात, परंतु खाडीलगत असलेल्या बंधार्‍याची डागडुजी न झाल्याने बांधबंदिस्ती उद्ध्वस्त होऊन दरवर्षी खाडीचे खारे पाणी शेतात घुसते. या वर्षी 90 टक्के शेती खार्‍या पाण्याने भिजून गेली असून, शेतात अद्यापही खारे पाणी आहे. दरवर्षी बांधबंदिस्ती उद्ध्वस्त होऊन खारे पाणी घुसत असल्याने शेतीत पीक घेणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. त्यामुळे बांधबंदिस्तीचे काम मार्गी लावून येथील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे संकट दूर करावे, असे सुडकोळी ग्रामपंचायत सदस्या रूपाली पाटील यांनी स्थानिक आमदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply