कर्जत : प्रतिनिधी
धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल अनेक चुकीचे गैरसमज पसरविले गेले. त्या वेळी लिहिलेल्या काही बखरींमधील चुकीच्या माहितीमुळे आणि एका इंग्रजी लेखकाने चुकीचे लिहिल्याने हा प्रकार घडला आहे. ते कसे खोटे आहे? ते पटवून देण्याचे काम आपण केले पाहिजे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे यांनी कर्जत येथे केले.
मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड आदी सहा संस्थांच्या वतीने कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वसंत कोळंबे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान यांनी समारंभाचे उद्घाटन केले. अनिल भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनील रसाळ यांनी प्रास्ताविकात संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीबाबतची माहिती सांगितली. या वेळी रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, गणेश ताम्हाणे, प्रतीक जुईकर, नामदेव बैकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कोठारी यांनी सत्काराला उत्तर दिले. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी सरपंच मधुकर घारे, हभप समीर महाराज सानप यांनी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे विजय कोंडीलकर यांनी सूचित केले.
कर्जत पं.स.चे माजी उपसभापती मनोहर थोरवे, उद्योजक प्रकाश पालकर, ज्ञानेश्वर भालिवडे, जगदीश ठाकरे, भगवान धुळे, उदय आवारी, श्रीकांत आगीवले आदी या वेळी उपस्थित होते. अनिल भोसले यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper