इचलकरंजी ः प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5)पावसाने जोरदार हजेरी लावली. इचलकरंजी, हूपरी, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातही पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
वादळी वारे आणि पावसामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरीदेखील कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत पाऊस झाल्याने नागरिकांना काही वेळेसाठी दिलासा मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात कडक उन्हामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यात सध्या काजूचा हंगाम आहे. सध्या दाट धुके पडल्यामुळे काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काजूही जास्त लागली नसल्याने या पावसाचा काजूवर काही परिणाम होतो का? याच्या प्रतिक्षेत काजू उत्पादक आहे.
सांगली शहर व परिसरात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळपासूनच सांगली शहरासह ग्रामीण परिसरात उष्णता जाणवत होती. त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
यामुळे उकड्यामुळे हैराण झालेल्या संगलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper