पनवेल ः रामप्रहर वृत्त
पर्जन्यवृष्टीमुळे व विमानतळाच्या भरावामुळे ओवळे गावात पाच फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर ओवळे गावाच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी (दि. 9) बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक ओवळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी लोकनेते रामशेठ
ठाकूर यांनी पुनर्वसन झालेच पाहिजे, अशी मागणी केली. या लढ्यामध्ये सर्वपक्षीय नेते तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ओवळे गावात मागील दोन महिन्यांत चार वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. पर्जन्यवृष्टीमुळे व विमानतळाच्या भरावामुळे ओवळे गावात पाच फुटांपर्यंत पाणी शिरले होते. ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ ओवळे यांच्या पुनर्वसनाच्या मागणीनुसार ओवळे गावातील मंदिरात सिडकोचे जॉइंट एमडी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रशांत नारनवरे यांनी ओवळे गावातील प्रथमतः पूरग्रस्त घरांचा पुढील आठवड्यात सर्व्हे करू, असे सांगितले. नंतर पूरग्रस्त घरांबाबत पुनर्वसनाचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण ओवळे गावाच्या पुनर्वसनाचा विषय हाताळला जाईल, असे सांगण्यात आले. या बैठकीस उरणचे आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते महेंद्र घरत, अमित मुंगाजी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओवळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते महेंद्र घरत यांच्यासह ग्रमस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper