Breaking News

बोध

प्रत्येक मुलामुलींनी जी मुलं आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात, पानउतारा करतात, क्षुल्लक कारणावरून रागवतात त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी आपल्या आई-वडिलांनी काय काय सोसलंय याची जाणीव व्हावी, हा या लेखामागील हेतू आहे. एका मध्यमवर्गीय मुलाच्या जीवनातील कहाणी आहे. मुलाला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले. मुलाचे वडील त्या खुशीने आनंदित होत, मार्कलिस्ट न्याहाळत असताना आपल्या पत्नीला म्हणजे मुलाच्या आईला, लडिवाळपणे गोड स्वरात आवाज देऊन सांगतात की, आपल्या बाळ्याला लाडक्याला 90  टक्के गुण  मिळाले आहेत आणि तो दहावी पास होऊन कॉलेजला जाणार आहे. छान लापशी बनव.

आई स्वयंपाक घरातून मुलाचं कौतुक करायला पळत पळत येत असते, इतक्यात मुलगा वडिलांच्या हातातून मार्कलिस्ट घेऊन पटकन बोलतो, बाबा तिला कुठे काय माहिती आहे. दहावीचा रिझल्ट काय दाखवत आहात, अशिक्षित आहे ती, तिला लिहिता वाचता येतं का? भरल्या डोळ्याने आई पदर पुसत, लापशी बनवायला निघून जाते. ही गोष्ट वडिलांच्या लगेच लक्षात येते. मग त्या मुलाच्या बोलात भर टाकून म्हणाले, ते पण खरंच आहे. बाळा, चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःचा स्वार्थ आणि मतलब बघतात, साधतात, पण, तुझ्या आईने आजवर तो कधीच बघितला नाही, कारण ती अशिक्षित होती न म्हणून…, तू पोटात होतास तेव्हा तिला दूध बिलकुल आवडत नसतानाही तू सदृढ व्हावास म्हणून नऊ महिने ती रोज दूध पीत होती. ती अशिक्षित होती म्हणून…, तुला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागायचं, म्हणजे स्वतः सकाळी 5 वाजता उठून तुझ्या आवडीचा नाष्टा आणि डबा बनवायची, ती अशिक्षित होती ना म्हणून, तू रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा, तेव्हा येऊन ती तुझी वह्या-पुस्तके बरोबर भरून तुझ्या अंगावर पांघरून घालून नंतरच झोपायची, अशिक्षित होती न ती म्हणून, तू लहानपणी बहुतेक वेळा आजारी असायचास, तेव्हा रात्र रात्र जागून ती परत सकाळी तिची कामं चोख करायची, अशिक्षित होती ना ती म्हणून, स्वतः मात्र एका साडीवर वर्षे चालवायची आणि तुला ब्रँडेड कपडे घेऊन द्या म्हणून माझ्या मागे लागायची अशिक्षित होती ती म्हणून, ती, जेवण बनवून आपल्याला वाढता, वाढता, कधी कधी स्वतः जेवायचं विसरून जायची अशिक्षित होती ना ती म्हणून, म्हणून अभिमानाने सांगतो की तुझी आई अशिक्षित आहे. वडिलांचे हे सगळं ऐकून मुलगा रडत रडत, आईला बिलगून बोलतो आई मी तर फक्त पेपर वर 93 टक्के मार्क मिळवले, पण माझ्या आयुष्याला 100 टक्के बनवणारी तू पहिली शिक्षक आहेस आणि ज्या शिक्षकांची मुले 93 टक्के मार्क मिळवतात त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केला नाही.

93 टक्के मार्क मिळवूनही मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे पीएचडीच्याही वरची डिग्री आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रूपात डॉक्टर, शिक्षक, वकील, माझे कपडे शिवणारी, ड्रेस डिझायनर, बेस्ट कुक या सगळ्यांचे दर्शन घेतले… अशिक्षित आई सज्ञान विद्यार्थी व शिक्षक घडवते, सुजान नागरिक घडवते, सुसंस्कृत बालक घडवते, सुदृढ तरुण घडवते, आई… आई ही आई असते. मग ती शिकलेली असो वा अशिक्षित, गरीब असो वा श्रीमंत मात्र ती आईच्या भूमिकेत गेली, तर आपल्या मुलाला सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी आपल्या जीवाचे रान करते. हा बोध ह्यातून घेतला जातो.  यानंतरची समोर आलेली दुसरी हकीगत अशीच, पण थोडी वेगळ्या स्वरूपात आहे

सौ. पाटीलबाई आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना, र्श्रेींश र्ूेी रश्रश्र असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही, पण त्यांना जाणवलं की खरं तर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत.त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता. तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि पाटील बाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मियता वाटेल असं, त्याची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं! त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या. कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बर्‍याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या. पहिली तिमाही झाली. प्रगतिपुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली. शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते.त्याप्रमाणे प्रगतिपुस्तके सहीसाठी गेली. मुख्याध्यापिकेने पाटीलबाईंना बोलावून घेतले. त्या म्हणाल्या, अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते. पालकांना कळायला हवे की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे. या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी! पाटीलबाई म्हणाल्या, मी त्या मुलाचं करू तरी काय? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू? ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा, मुख्याध्यापिका म्हणाल्या. मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणार्‍या व्यक्तीला बोलावून घेतले आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके पाटीलबाईंकडे पाठवून दिली. पाटीलबाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली. तिसरीच्या प्रगतिपुस्तकावर शेरा होता, शैलेश हा वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे! त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चौथीचे प्रगतिपुस्तक पाहिले, त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की, त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे. त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोहोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती आणि ते हळूहळू त्या शेर्‍यांमधून ध्वनीत होत होते. सहावीत शेरा होता, शैलेशने त्याची आई गमावली आहे आणि तो स्वतःही हरवल्यागत झाला आहे. आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू! आतापर्यंत पाटीलबाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या, मला कळले काय करायला पाहिजे ते! पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, र्श्रेींश र्ूेी रश्रश्र पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत. कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणार्‍या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती! त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं. आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता. त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या. दिवस जात होते. शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी शिक्षकांसाठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या. एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेले होते. शिक्षिकेच्या अंतःप्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते. एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या. एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते. सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं. काही न बोलता पाटीलबाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या. आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला, आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय! ती मला सोडून गेली त्याआधी तिने वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता आणि शेवटी तिच्या हातात याच बांगड्या होत्या!

एक वर्षानंतर,

म्हणजे शाळा संपली तेव्हा, पाटीलबाईंच्या टेबलावर एक पत्र होते. मला जेवढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात. -शैलेश त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे. वर्षे निघून गेली. त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअरवाला शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले. त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, झह.ऊ. या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती.

पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने. मला जगात खूप माणसे भेटली, पण तुम्ही सर्वांत छान आहात! मी लग्न करतोय आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे. पाटीलबाईंकडे आता तो परफ्युम नव्हता, पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या. पाटीलबाईंना राहावले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते. त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहात होत्या, मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले. तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती…आई. त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच. लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला, ह्या नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो! त्यावर पाटील बाई उत्तरल्या, ‘शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं, की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक!’ उपस्थितांच्या  डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply