Breaking News

महिलांच्या आगामी वन डे विश्वचषकात बाद फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस

वेलिंग्टन : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवल्यामुळे टीकेला सामोरे जाणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणातून बोध घेतला आहे. 2021मध्ये रंगणार्‍या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही उपांत्य लढती, तसेच अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात येणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गेल्या आठवड्यातच झालेला पहिल्या उपांत्य सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताने साखळीतील सलग चार विजयांच्या बळावर उपांत्य फेरी गाठली. विशेष म्हणजे उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये दोन दिवसांचे अंतर असूनही राखीव दिवसाची तरतूद न केल्याने जगभरातील क्रीडाप्रेमींनी आयसीसीवर ताशेरे ओढले होते.
न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणार्‍या 2021च्या विश्वचषकातील सामन्यांची रूपरेषा आयसीसीने जाहीर केली. 6 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान रंगणार्‍या या स्पर्धेसाठी आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या चार संघांनीच पात्रता मिळवली असून, चार संघांचे स्थान निश्चित होणे बाकी आहे. 3 आणि 4 मार्च रोजी उपांत्य सामने खेळवण्यात येणार असून, 7 मार्चला ख्राइस्टचर्च येथे अंतिम लढत होईल.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply