औरंगाबाद : प्रतिनिधी
राज्यात दररोज 500 ते 600ने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काही ठराविक ठिकाणी खासकरून विदर्भ, मुंबईत रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नियम पाळावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे, तर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात गतवर्षी तब्बल सात महिने कोरोनाचा अक्षरश: कहर पाहायला मिळाला. अखेर ऑक्टोबरपासून कोरोनाला उतरती कळा लागली. रुग्णांचा आलेख घसरला, मृत्यूचे प्रमाणही घटले. त्यानंतर लसीकरणही सुरू झाले. नागरिकांच्या मनातील भीती दूर झाली. त्यामुळे मास्कचा वापर, सामाजिक अंतर, हाताच्या स्वच्छतेकडे नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, सध्या नियम पाळले जात नाही हे स्पष्ट दिसतेय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले, मात्र नियम पाळावे लागतील, जर नाही पाळले तर पाश्चिमात्य देशांत लॉकडाऊन सुरू झालाय, तसा आपल्यालाही करावा लागेल. लोकलसेवा आताच सुरू केली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. टोकाचा निर्णय घ्यायची वेळ अजून तरी आली नाही.
Check Also
पनवेलमध्ये ८ ऑगस्टला महारोजगार मेळावा
दहावीपासून पदव्युत्तर, कुशल उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल ः रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper