
नवी मुंबई : बातमीदार
केरळी समाजाने अनोखा उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. नवी मुंबई बाहेरून येणारी सर्वाधिक गर्दी ही रेल्वे स्थानकांतून येत असते हे लक्षात घेत या समाजाने सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग असलेल्या नेरुळ रेल्वे स्थानकात दोन्ही बाह्य बाजूस तीन-तीन वॉश बेसिन बसवून दिले आहेत. तसेच साबण उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांकडून देखील त्यास उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. कोरोनाशी लढण्यास सर्वच प्रशासने सर्वतोपरी उपाय करत आहेत. जनतेला स्वच्छता राखण्याचे व गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. काही कंपन्यांनी 100 टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक कंपन्यांनी 50 टक्के कर्मचारी वर्गालाच यायला सांगितले आहे. त्यामुळे अद्यापही अनेक नागरिक मुंबई, पनवेल, ठाणे येथे जात आहेत. त्यासाठी रेल्वेचा मार्ग अवलंबत आहेत. मात्र आता रेल्वेतील गर्दीतूनच या विषाणूंचा संसर्ग वाढीस लागण्याची दाट शक्यता आहे. नागरिक देखील गर्दी टाळत नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. नवी मुंबईतून देखील नोकरीनिमित्त बाहेर पडणारा वर्ग आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्वाधिक लोकसंख्येच्या नेरुळ विभागातील रेल्वे स्थानकात स्वच्छता राहावी, या किटाणूचा प्रसार होऊ नये म्हणून नवी मुंबई केरळ समाज पुढे आला आहे. गर्दीला आवर घालणे शक्य नसल्याने या समाजाने थेट नेरुळ रेल्वे स्थानकाच्या बाह्य बाजूस पश्चिम व पूर्वेला वॉश तीन-तीन वॉश बेसिन उभारले आहेत. वॉश बेसिनच्या वर स्वच्छता राखण्याचा बॅनर लावून जनजागृती सुरू केली आहे. मुख्य म्हणजे शासनाकडून हात स्वच्छ धुण्याच्या केलेल्या सततच्या आवाहनाचा देखील हा सकारात्मक परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper