उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात पाळीव गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून, रात्री-अपरात्री गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बेहोष करून गुरे चोरून नेली जात आहेत. पर्यायाने बळीराजाचे पशुधन संकटात येत असल्याने या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पशुधन कमी झाले आहे. मात्र काही ठराविक गरीब शेतकरी घरातील दूध दुभत्यांसाठी व शेतीच्या कामासाठी काही पशुधन सांभाळून ठेवले आहेत. या पशुधनावर काही चोरट्यांची नजर पडली असून, सतत चार दिवस मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी उरण बोरी,करंजा अशा वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी रात्रीच्या वेळी गावात कोणी जागे नसल्याचा फायदा घेऊन करंजा येथून गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये एका गाभण गाईचाही समावेश असून, करंजा येथून मागील तीन दिवसांपूर्वी एका कुटुंबाची एक गाभण गाई गायब झाली. त्यानंतर उरण बोरी मार्गावरून स्कुटरवर आलेल्या जोडप्याने हा प्रकार पाहिल्याने गुरे चोरणारी टोळी त्या ठिकाणाहून गाडीत भरलेली पाळीव गुरे घेऊन पसार झाले. तसेच पुन्हा शनिवारी रात्रीच्या वेळी करंजा येथील बेशुद्धावस्थेत असलेल्या गुराला टेम्पोमध्ये भरत असताना काही मोटरसायकल वरून कामावरून आलेल्या तरुणांच्या सतर्कतेमुळे या टोळीने तेथून पलायन केल्याने त्या गुरांचे प्राण वाचले.
त्यामुळे शेतकर्यांचे पशुधन वाचण्यासाठी पोलीस यंत्रणेने या टोळ्यांचा व टोळ्यांना मदत करणार्या स्थानिक गुरे माफियांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आहे.
ही टोळी तळोजा परिसरातील असल्याचा अंदाज आहे. आम्ही जास्तीच जास्त पोलिसांची गस्त वाढवून लवकरात लवकर त्या टोळीचा बंदोबस्त करून त्यांना जेरबंद केले जाईल.
– जगदीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण
RamPrahar – The Panvel Daily Paper