
माणगाव ः प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून या सणाला मुंबईहून अनेक चाकरमानी आपल्या गावांकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच गणरायाला आनंदाने घरी आणण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी माणगाव तालुक्यातील वावेदिवाळी-महागाव रस्त्यावरील तसेच दक्षिण रायगडातील अनेक गावांतून पडलेले रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी भाजपच्या दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा हेमा मानकर यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात हेमा मानकर यांनी म्हटले आहे की, गावोगावी गणरायाचे आगमन होताना कुठेही खड्ड्यांचे विघ्न येऊ नये यासाठी बांधकाम खात्याने दक्षिण रायगडातील वावेदिवाळी ते महागाव रस्त्याबरोबरच इतर गावांतील रस्ते गणेशोत्सवापूर्वी सुधारावेत, तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे जलदगतीने बुजविण्यात यावेत, जेणेकरून मुंबईतून गावांकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल. गणरायाच्या आगमनावेळी गणेशभक्तांना रस्त्यातील खड्ड्यांचे विघ्न येणार नाही याची काळजी बांधकाम खात्याने घेऊन या सर्व रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी हेमा मानकर यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper