नवी मुंबई : बातमीदार
आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भाजपचे युवा नेते निशांत भगत यांनी आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांसमोर त्यांच्या प्रभागातील महत्वाचे तीन मुद्दे मांडले. ज्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम कोविड व्यतिरिक्त होणार्या आजारांवर लक्ष वेधले.
चिकन गुनिया ह्या तापसदृश्य आजाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, वाशी गावात चिकन गुनियाचे सहा संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ठिकठिकाणी साचून राहणार्या पाण्यामुळे मच्छरांची पैदास तर होतेच व नागरिकांनाही याचा त्रास विविध आजारातुन उद्भवतो. ही आयुक्तांनी ही सुचना मान्य करुन या जागेत फवारणी लवकरच करण्यात येईल व पाणी साचून न राहण्यासाठीही उपाययोजना करु, असे आश्वासन दिले.
वाशी गावातील मच्छी मार्केटच्या वाढत जाणार्या गर्दीचा मुद्दा भगत यांनी उपस्थित केला. वाढणार्या गर्दीमुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. मच्छी मार्केटसमोर असणार्या टाटा लाईन हायटेंशनच्या मोकळ्या जागेत थोडी साफसफाई करुन सुरक्षित अंतर ठेऊन मार्केट ठेवावे अशी मागणी केली.
तसेच नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून रेमेडेसिवीर इंजेक्शन मोफत दिले जाते, पण याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही.नव्या मुंबईत क्वारंटाइन सेंटर व्यतिरिक्त अन्य ठिकाणांहूनही या इंजेक्शनची मागणी होते, मात्र मोफत उपलब्धतेची माहिती नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांचीही बरीच भटकंती होते, असेही भगत यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper