Breaking News

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनावरून दरेकरांचा इशारा; …तर सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार

मुंबई : प्रतिनिधी

राज्यभर सुरू असलेले एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यवतमाळ, इगतपुरीसह इतर ठिकाणांहून चार बस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या, मात्र या कर्मचार्‍यांना डांबून ठेवले आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळक लागेल. याची जबाबदारी सर्वस्वी सरकारवर राहील, असा इशारा रविवारी (दि. 21) भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला. भाजप नेते प्रवीण दरेकर रविवारी आक्रमक झालेले दिसले. दरेकर म्हणाले की, सरकार एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन दडपण्याचे काम करीत आहे. यवतमाळ व अन्य ठिकाणाहून चार बसेस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या. मात्र, त्यांना इगतपुरी येथे अडवून ठेवले आहे. त्या कर्मचार्‍यांचे मोबाइल हिसकावून घेतले आहेत. प्रशासनाने 40 कर्मचार्‍यांना तेथेच डांबून ठेवले आहे. कर्मचारी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत आहेत, परंतु जर सरकार आंदोलन दडपत असेल, तर त्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल. जर आंदोलन हिंसक झाले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा दरेकर यांनी दिला. तसेच सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाड येथून 21 एसटी कर्मचारी निघाले होते, मात्र त्यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतल्याचे समजते. मनमाड येथून पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलन मुंबईकडे निघाले होते. त्यांना मनमाड रेल्वेस्थानकाबाहेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट आहे. मागण्या मान्य करेपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. संपाची कोंडी फुटत नसल्याने सर्वसामान्यांची प्रचंड फरपट सुरू आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. जवपास 10 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. त्यात एसटीच्या खाजगीकरणाची सुरू झालेली चर्चा. नाशिकमधल्या पेठ आगारातील कर्मचार्‍याने कमी पगारामुळे केलेला आत्महत्या. या सार्‍या घटनांमुळे एसटीच्या कर्मचार्‍यांचा संताप वाढला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील अनेक कर्मचारी मुंबईला येत आहेत, मात्र त्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply