कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकार्यांनी सकारात्मक भूमिका घेत कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. कर्जतचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या दालनात नेरळ ग्रामपंचायत कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. गटविकास अधिकार्यांसह नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य उमा खडे, गीतांजली देशमुख, श्रद्धा कराळे, मनसे नेते संदीप देशपांडे, उत्तम पांडव, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, तसेच हेमंत चव्हाण, सुभाष नाईक, कामगार प्रतिनिधी चंदू राठोड, गणेश चंचे, संतोष दरवडा, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर आदी या बैठकीला उपस्थित होते. कामगारांचे मागील चार महिन्यांचे थकीत वेतन दोन-तीन टप्प्यात दिले जाईल आणि महिन्याचे वेतन 15 तारखेच्या आत देण्यात येईल असे आश्वासन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी या वेळी दिले. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी व विमा हप्त्यांची रक्कम लवकरात लवकर भरण्याचे तसेच सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper