मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीतील मिठागर येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या रस्त्यावरून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे.
मुरूड-मिठागर अंतर्गत नवीन रस्ता 1992 बनविण्यात आला होता. तेंव्हापासून या रस्त्याची डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे आता या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहन चालविणे जिकरीचे होत आहे. दुचाकी वाहनांचे अनेक छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर झाले आहेत. बाहेर आलेल्या खडीवरून दुचाकी वाहने घसरतात. त्यात अनेकांना इजा झाली आहे. पादचार्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येथे नवीन रस्ता करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.