Breaking News

ओएनजीसीकडून मच्छीमारांना  नुकसानभरपाई मिळण्यासाठी साकडे

आमदार रमेश पाटील यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट

मुरूड : प्रतिनिधी

ओएनजीसीच्या ससेमिक सर्व्हेच्या काळात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्याची मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्याकडे केली.

खोल समुद्रात तेल शोधण्यासाठी ओएनजीसी मार्फत ससेमिक सर्वे केला जातो. त्यात समुद्राच्या तळाशी मोठंमोठ्या वायर टाकून स्फोट केले जातात. या स्फोटामधून तेल बाहेर आल्यास कंपनीस मोठा आर्थिक फायदा होतो. मात्र हा सर्वे केला जातो, त्यावेळी त्या भागातील मच्छिमारी पूर्णतः बंद केली जाते. किमान दोन ते अडीच महिने मच्छिमारी बंद केल्यामुळे स्थानिक मच्छिमारांना मोठे नुकसान सोसावे लागते. याबाबत मच्छिमारांच्या तक्रारी प्राप्त होताच आमदार रमेश पाटील  त्यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांची दिल्लीत भेट घेतली.व मच्छीमारांची कैफियत मांडली.

गेल्या दहा वर्षांपासून पालघर व रायगड जिल्ह्यात ओएनजीसी मार्फत ससेमिक सर्व्हे होत असल्यामुळे तेथील स्थानिक मच्छीमार बांधवांचे खूप नुकसान होत आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती व कोरोनामुळे मच्छीमार बांधव बेजार झाला असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात जून, जुलै या दोन महिन्यात मासेमारी बंदी असते मात्र शासनाकडून मच्छीमारांना कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे  ससेमिक सर्व्हेच्या काळात मच्छीमार बांधवांचे होणारे नुकसान लक्षात घेता त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्याकडे केली. यावर मंत्री महोदयांनी चौकशी करून त्यामध्ये मच्छीमार बांधवांचे नुकसान होत असल्याचे आढळून आले तर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply