Breaking News

ओल्या काजूगरांचा हंगाम सरला

आवक कमी, किंमत वाढली, खवय्यांचा हिरमोड

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात ओल्या काजुगरांचा हंगाम साधारण फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला आहे. हा पहिला हंगाम सध्या सरत चालला असल्याने बाजारात काजुगरांची आवक कमी झाली आहे. परिणामी किंमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे खवय्यांचा हिरमोड झाला आहे.

फेब्रुवारीत पहिल्या हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात 350 ते 250 रुपये शेकड्याने ओले काजूगर मिळत होते. मात्र त्यानंतर उत्पादन वाढल्याने आवक जास्त होऊ लागली. परिणामी साधारण मार्च ते एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत किंमत उतरून 150 ते 200 रुपये शेकडा आणि 10 रुपये वाट्याने ओले काजूगर सर्वत्र मिळत होते. मात्र आता ओल्या काजूगरांचा पहिला हंगाम संपला आहे. उत्पादन घटले व आवक कमी झाली. परिणामी पुन्हा एकदा ओले काजूगर महागले असून 250 ते 300 रुपये शेकडा आणि 20 रुपये वाट्याने मिळत आहेत. हंगाम संपल्याने व उत्पादन घटल्याने सध्या  फार कमी प्रमाणात बाजारात काजूगर विक्रीसाठी येत आहेत.

मात्र काही दिवसांनी ओल्या काजुगराचा दुसरा हंगाम सुरू होईल व पुन्हा एकदा मुबलक काजूगर उपलब्ध होतील व किंमती पुन्हा खाली येतील. निसर्गाने साथ दिल्यास हा हंगाम साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यापर्यत चालेल, असे लक्ष्मी पवार या काजूगर विक्री करणार्‍या महिलेने सांगितले.

घरात सर्वांना ओले काजूगर खूप आवडतात. यंदा पहिला हंगाम लवकर संपला. शिवाय भावदेखील वाढले आहेत.

-निलेश पवार, ग्राहक, जांभुळपाड़ा, ता. सुधागड

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply