Breaking News

…तेव्हा तुम्ही रांगत होता

बाबरी मशिद पाडण्यावरून सेना-भाजपात संघर्ष; भाजपचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई ः प्रतिनिधी

अयोध्येमधील बाबरी मशिद पडाण्याच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी घेतलेल्या बुस्टर सभेमध्ये बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे होतो पण एक शिवसैनिकही त्या ठिकाणी नव्हता, असा दावा केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनाही या वादात उडी घेत फडणवीसांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. याच वक्तव्यानंतर आता भाजपने आदित्य ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

मुंबईत सोमवारी (दि. 2) बेस्ट उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या कॅन्टीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आदित्य ठाकरे यांनी, 1857 च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल, अशी खोचक प्रतिक्रिया नोंदवली. आदित्य यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. केशव उपाध्ये यांनी या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे तसा तुम्हाला इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही आणि एकंदरीत ज्या उथळपणे व्यक्त झालात, त्यावरून तुम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य नाही हेही स्पष्ट झालंय, अशी टीका केली.

 आत्मपरीक्षण करावे -केशव उपाध्ये

राममंदिरासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिला, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, अयोध्येतील तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींसोबत सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर आता राम आणि राममंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचेही जरा आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिला.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply