पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर-महाबळेश्वरदरम्यान असलेल्या सुमारे 32 किमी. अंतराच्या आंबेनळी घाट (फिटझगेराल्ड) रस्त्याची गेल्या वर्षी अतिवृष्टी व भुस्खलनामुळे वाताहत झाली होती. त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र, नजिकच्या काळात होणार्या पोलादपूर-वाई-शिरूर या राज्यमार्गाच्या रूंदीकरणासोबतच आंबेनळी घाटाचे रूंदीकरण होण्याची गरज निर्माण झाली आहे.
22 जुलै 2021 रोजी रात्रभर अतिवृष्टी आणि भुस्खलन झाले. त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्दपासून आंबेनळी घाटाच्या सुरूवातीपासूनच दरडी कोसळून राज्यमार्ग दरीमध्ये वाहून गेला. आणि या घाट रस्त्याने वाहने घेऊन जाणे सुमारे महिनाभर तरी अशक्य झाले होते. सातारा जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य नव्हते तिथे महाड विभाग आणि पोलादपूर उपविभागामार्फत घाटरस्ता दुरूस्त करण्यात आला. सद्यस्थितीत महाबळेश्वरपर्यतचा रस्ता काही ठिकाणी अरूंद तसेच काही प्रमाणात वाहतुकीस धोकादायक असूनही एसटी बसेस, जीप आणि अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र, पावसाळ्यामध्ये पुन्हा या घाटरस्त्याला धोका निर्माण होणार असल्याने या घाटरस्त्याचे रूंदीकरण करण्याची गरज आहे. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी करंजाडी रेल्वे स्थानकापासून विन्हेरे काटेतळी पोलादपूरमार्गे महाबळेश्वरपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित करून आंबेनळी घाटाचे रूंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे या मार्गावरून पर्यटन विकास तसेच ऐतिहासिक दर्शन साध्य होणार आहे.