मुरूड : प्रतिनिधी
सध्या मुरूड शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पर्यटकांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरणविरोधात जनांदोलन करण्याचा इशारा शिवसेनेेने दिला आहे. मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे हजारो पर्यटक येत असतात परंतु वारंवार वीज घालवल्यामुळे पर्यटकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या घाटण्याची शक्यता आहे. तसेच काही विद्यार्थ्यांच्या ऑन लाइन परीक्षा सुरु आहेत. शहराचा पाणीपुरवठा विद्युत पंपांवर अवलंबून असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. खंडित वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराची उपकरणेसुद्धा खराब होत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे शहर प्रमुख आदेश दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 6) महावितरणचे मुरूड येथील उपमुख्यकार्यकरी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विजेची अनियमितता न सुधारल्यास महावितरणच्या विरोधात जनांदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन महावितरणचे मुरूड शहर अभियंता राठोड यांनी स्वीकारले. या वेळी माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, माजी नगरसेवक प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, मुग्धा जोशी, मेघाली पाटील, अनुजा दांडेकर, उपशहर प्रमुख विजय वाणी, विभाग प्रमुख राजेश मुळेकर, हरिश्चंद्र बैकर आदी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती मुरूड तहसीलदार व पोलीस ठाण्यालाही देण्यात आल्या आहेत.