Breaking News

तळोजा एमआयडीसीत अमलीसाठा नष्ट

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी परिसरात जप्तीच्या पदार्थांची विल्हेवाट

पनवेल : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आजादी का अमृत महोत्सवा निमित्त केलेल्या आयकॉनिक विकच्या पार्श्वभूमीवर  भारतीय कस्टमने तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट बुधवारी (दि. 8) लावली. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

देशामध्ये अमली पदार्थ विरोधी कायदा आहे. चरस, गांजा तसेच ड्रग्स आणि इतर वस्तू जवळ बाळगणे त्याचबरोबर त्याचे सेवन करणे या व्यतिरिक्त व्यापार करण्यास प्रतिबंध आहे. अशाप्रकारे अमली पदार्थ बाळगणार्‍याविरोधात कायद्याने गुन्हे दाखल करतात. त्यांना शिक्षा सुद्धा केली जाते. त्यामुळे विमानतळ तसेच मालवाहतूक करणारे बंदरे या शिवाय रेल्वे स्थानक येथे अमली पदार्थ विरोधी पथके त्याचबरोबर केंद्रीय कस्टम विभागाकडून तपासणी केली जाते. बाहेरून येणार्‍या-जाणार्‍या अमली पदार्थ जप्त करून ते सिल केले जातात. अशा वेगवेगळ्या अमली पदार्थांना नष्ट करण्यासाठी एनडीपीएस कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. अनेकदा न्यायालयासमोर जप्त केलेले आमले पदार्थ नष्ट करावे लागतात. तर काही जप्त केलेल्या अमली पदार्थ न्यायालयाच्या परवानगीने नष्ट केले जातात.

बुधवारी देशातील 14 केंद्रांवर अशा प्रकारे अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यापैकी तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीचा समावेश होता. याठिकाणी सुमारे 2043 किलो पेक्षा जास्त अमली पदार्थांचा नायनाट करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने 1064 किलोग्रॅम मेथॅम्फेटामाइन, 238 किलोग्रॅम मेफेड्रोन, 483 किलोग्रॅम इफेड्रीन आणि 204 किलोग्रॅम मॅड्राक्स हे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिकचा समावेश होता. हा जप्त केलेल्या मालाची किंमत 225 कोटी इतकी होती.

कस्टम विभागाचे अधिकारी त्याचबरोबर कोस्टल गार्ड आणि मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे डायरेक्ट सोमनाथ मालघर कंपनीचे अधिकारी अभियंते कर्मचारी या वेळी उपस्थित होते. आजच्या आधुनिक मशनरीच्या माध्यमातून जप्त केलेले अमली पदार्थ यावेळी नष्ट करण्यात आले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, महसूल सचिव तरुण बजाज सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकार्‍यांशी संवाद साधला.

गेल्या तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या कारवायांमध्ये हस्तगत करण्यात आलेला अमली पदार्थ माल 8 जुन रोजी नष्ट करण्यात आला आहे. ती मोठी उपलब्धी असून भविष्यात अमली पदार्थ संपूर्ण देशामध्ये बाळगणे आणि सेवन करणार्‍यांची संख्या अत्यंत कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट घेऊन केंद्र सरकारचे अमली पदार्थ विरोधी विभाग काम करत असल्याचे अधिकार्‍यांनी या वेळी सांगितले.

अमली पदार्थविरोधात मोहीम तीव्र!

देशात अमली पदार्थ बाळगणे आणि त्याचे सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होते. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अमली पदार्थ मुक्त भारत हे अभियान राबविण्यात येत आहे. केंद्रीय आमली विरोधी विभागाचे डॉग स्कॉड त्याचबरोबर इंटेलिजन्स ब्युरो अधिक जबाबदारीने काम करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धाडी टाकून त्याचबरोबर मालाची वाहतूक होत असताना तो पकडण्याचे काम केले जात आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply