रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची त्रेधातिरपीट
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील पाली शहरात शनिवारी (दि. 18) जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसात पालीत दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक व नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
पाली शहरातील भोईआळी परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने तेथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामुळे पादचार्यांना चालताना अडचण येत होती.
याशिवाय दुचाकी व चारचाकी वाहनांना मार्ग काढणे कठीण जात होते. या मार्गावरुन वाहने गेल्याने साचलेले पाणी पादचार्यांच्या अंगावर उडत होते. लवकर उपयोजना केली नाही तर नागरिकांना हा त्रास संपूर्ण पावसाळ्यात सहन करावा लागणार आहे. रस्त्यांवरील पावसाच्या साचलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
पाली शहरातील हाटाळेश्वर ते भोईआळी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असल्याने तेथे नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसते.