भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल मनपा हद्दीमध्ये भूखंड राखीव ठेऊन तेथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी मोठे मोलाचे कार्य केले आहे, तसेच महिलांसाठी प्रथम शाळा सुरू केल्या. रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका हद्दीतील पोदी हे गाव फुलमाळी समाजाचे गाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात हे एकच गाव फुलमाळी समाजाचे असून नोकरी धंद्यानिमित्त माळी समाज पनवेलमध्ये स्थायिक झाला आहे. माळी समाजाबरोबरच येथील मूळ आगरी, कराडी इतर बारा बलुतेदार असे अनेक इतर मागासवर्गीय समाज या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वास्तव्यास आहेत. या सर्व समाजाच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीसाठी महानगरपालिका हद्दीत भूखंड राखीव ठेऊन त्यावर सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन झाल्यास त्यांच्या कामाचा वसा नवीन पिढीला प्रेरित करेल, असे अॅड. मनोज भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनाही दिली आहे.