Breaking News

गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. 24) येथे केले.
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त उत्तर रायगड भाजपच्यावतीने पनवेल, उरण, कर्जत व खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, श्रीनंद पटवर्धन, नीलकंठ घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक बबन मुकादम, अल्पसंख्याक नेते मन्सूर पटेल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमरीश मोकल, शिवाजी दुर्गे, अशोक साळुंखे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हंटले कि, आम्हाला तुमचा अभिमान आहे पण त्याचबरोबरीने तुमच्या विजयासाठी युवा, महिला, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे, त्यांचे मी विशेष अभिनंदन करत आहे. निवडून आलो म्हणून ती हवा डोक्यात न आणता पाय जमिनीवर ठेवून गावांच्या विकासासाठी काम केल्यास पुढील काळातही यशस्वी मार्गक्रमणाची संधी असते त्यामुळे याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. भाजप जिंकण्यासाठी नाही तर लोकांच्या कल्याणासाठी काम करीत आहे, त्यामुळे गावांच्या विकासाचे ध्येय्य कायम ठेवा, अशी सूचनाही त्यांनी केली. ज्या ग्रामपंचायतीत सदस्य संख्या कमी होती त्या ठिकाणी सदस्य संख्या वाढवण्याबरोबरच सरपंच पदाची बाजी आपण सर्वानी मारली आहे. या यशातून आपल्या सर्वाना मार्गक्रमण करताना आगामी विविध निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवायचे आहे आणि त्यासाठी तशी मेहनत करा, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासात बदलत आहे, विविध योजना अंमलात येत आहेत, त्या अनुषंगाने या योजनांचा आधार आणि दूरदृष्टी ठेवून काम करा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. पद्मश्री, पद्मभूषण अशी मानाची पुरस्कार पूर्वी सिनेकलाकार, उद्योजक यांनाच दिले जायचे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने असामान्य कार्य करणार्‍या सामान्य लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक असलेल्या राहीबाई पोपेरे, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्यासारख्या अनेक तळागाळात काम करणार्‍या पण प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आदर्श व्यक्तींना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आणि हा सन्मान म्हणजेच जमिनीवर पाय असलेल्या माणसाचा सन्मान होता, त्यामुळे ज्या प्रमाणे आपण देवदर्शनाला जातो त्याचप्रमाणे ज्या गावातून महाराष्ट्रात आदर्श निर्माण झाला त्या गावांना भेट द्या, थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावाला भेट, हिरवे बाजारला भेट, बिजामातेची भेट घ्या, त्यांच्याकडून गावांच्या विकासाची प्रेरणा आणि मार्गदर्शन घ्या, असेही त्यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले. कोरोनाचे संकट आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी गरीब कल्याण योजना राबवून मोफत अन्नधान्य दिले आणि ती योजना पुढेही कायम करत करोडो नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे असे सांगतानाच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांचा ’मन कि बात’ हा संवादाचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्यातून राजकरण नाही तर देशाच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा होत असते त्यामुळे प्रत्येकाने मन कि बात आवर्जून पहावे असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी सांगितले कि, मागील काळात ज्या ठिकाणी आपल्याकडे सदस्य नव्हते त्या ठिकाणीही चार पाच पक्ष एक करत विरोधकांनी निवडणूक लढवली पण आपण एकटे आणि काही ठिकाणी आपल्यासोबत मित्रपक्ष असताना आपण विरोधकांना निवडणुकीत धूळ चारली आहे. आता ग्रामपंचायतीचा कारभार चालवताना गावांचा विकास परिपूर्ण कसा होईल त्याकडे लक्ष केंद्रित करा, विकासासाठी निधीची कमी नाही, काम करण्याची इच्छाशक्ती हवी आणि ती तुमच्यात आहे, काम करा गावाचा विकास करा निधीची कमतरता पडणार नाही, असे आमदार महेश बालदी यांनी आश्वासित केले.

भाजप बहुजन समाजाचा पक्ष आहे, या ठिकाणी सर्वसामान्यांचा विचार होतो. त्यामुळे भाजप जगातील क्रमांक एक चा पक्ष आहे. आपण निवडणुकीत दरवेळी यश मिळवतो, यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जिंकायचीच आहे.
– बाळासाहेब पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप

जगात देशाची उंची वाढवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ग्रामपंचायतीपासून दिल्ली पर्यंत भाजपचाच डंका आहे. त्यामुळे ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडा.
– विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस, भाजप

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply