Breaking News

पेणमधील खारबंदिस्ती पूर्ववत करण्याची शेतकर्‍यांची मागणी

पाली ः प्रतिनिधी
तालुक्यातील खारमाचेला, खारचिर्बी, व जुईअब्बास विभागातील साधारणतः 2700 एकर शेतीत खारे पाणी शिरून सुपीक शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खारलँड विभागाने शेतीचा बचाव करणारी खारबंदिस्ती खारबंदिस्ती पूर्ववत करावी, अशी मागणी खारमाचेला विभागातील शेकडो शेतकर्‍यांनी केली आहे. या संदर्भात खारलँड विभागाला सोमवारी (दि. 26) निवेदन देण्यात आले. खारलँड विभाग व प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खारमाचेला, खारचिर्बी व जुईअब्बास खारभूमी योजनेमध्ये खारमाचेला, खारचिर्बी, खारघाट, खार जांभेला, खारढोम्बी, खार म्हैसबाड, खारपाले, खारमौजे, खारदेवळे, खारकासू, खारबुर्डी, खारसालींदे, खारपांडापूर ही महसूल गावे समाविष्ठ आहेत. येथील खारबंदिस्ती व उघाड्यांची दुरुस्ती बर्‍याच वर्षांपासून करण्यात आली नाही. यामुळे खांडीमधून समुद्राचे खारे पाणी जाऊन सुपीक जमिनी नापीक होत आहेत. हा बंधारा त्वरित बांधावा, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन करू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी शेतकरी तुळशीदास कोठेकर, अंकुश म्हात्रे, निलेश कोठेकर, दीपक कोठेकर, समीर म्हात्रे, प्रभाकर कोठेकर, प्रशांत म्हात्रे, अभिमन्यू कोठेकर, परशुराम मोकल, अनिल कोठेकर, अमोल म्हात्रे, विजय मढवी, कृष्णा म्हात्रे, हरेष कोठेकर, स्वप्नील सीताराम कोठेकर, अमित पाटील, हेमंत कोठेकर, किशोर मोकल, प्रभाकर कोठेकर, जगदीश कोठेकर, सुनील मोकल आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply