नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या संपूर्ण जगभरात आयपीएलच्या सामन्यांची क्रेझ आहे. याच वेळी 30 मे रोजी इंग्लंडमध्ये सुरू होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कंबर कसली आहे. 15 एप्रिल रोजी बीसीसीआयची निवड समिती, मुंबईत विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करणार आहे, मात्र खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीचा विश्वचषकातील संघ निवडीशी कोणताही संबंध नसेल, असे निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
आयपीएलमधली कामगिरी विश्वचषकासाठी संघ निवडताना ग्राह्य धरली जाणार नाही. एखाद्या खेळाडूची आयपीएलमधील दमदार कामगिरी रिक्त जागेसाठी निर्णयाक ठरू शकते, मात्र याची खात्री देता येत नाही, आम्ही आमची बाजू स्पष्ट केलेली आहे. एका वाहिनीशी बोलत असताना प्रसाद यांनी ही माहिती दिली.
याआधी भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानेही, आयपीएलच्या कामगिरीवर विश्वचषकासाठीचा संघ निवडला जाऊ नये, असे म्हटले होते. ट्वेन्टी-20 षटकांच्या स्पर्धेतील कामगिरीचे निकष वन-डे क्रिकेटच्या कामगिरीसाठी लावणे अयोग्य असल्याचेही रोहित म्हणाला.
भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार आणि अतिरिक्त यष्टीरक्षक कोण असेल याबद्दल निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.