साहित्य भस्मसात; मोठे नुकसान
उरण : बातमीदार, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदराजवळ असलेल्या व सोनारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्पीडी कंपनीशेजारी असलेल्या दुकांनांना रविवारी (दि. 1) रात्री 1.30 च्या सुमारास अचानक आग लागली. लागलेल्या प्रचंड आगीमूळे 20 हून जास्त दुकाने आगित भस्मसात झाली.
दुकांनांना लागलेल्या आगीमुळे दुकानातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाल्याने दुकानधारकांवर बेकारीची कुहाड कोसळली असून या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जेएनपीटी प्रशासनाने 30 वर्षांपूर्वी स्थानिक भूमीपुत्रांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून स्पीडी कंपनीच्या बाजूला त्यांना जागा देऊन त्यांना दुकान चालविण्यास दिले. या दुकानामूळे या सदर कुटुंबाचा निर्वाह या स्टॉलवरच अवलंबुन होता, आता मात्र हे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने आता उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने खूप मोठे दुःखाचे डोंगर त्यांच्यावर कोसळले आहे.
नुकसानग्रस्तांना जेएनपीटी प्रशासनाने आर्थिक मदत करावे. त्यांचे पुनवर्सन करावे अशी मागणी सोनारी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश कडू यांनी जेएनपीटी प्रशासनाकडे केली आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा अधिक तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरु आहे. आग लागल्याचे समजताच तलाठी येऊन त्यांनी जागेचे व नुकसानाचे पंचनामे केले.
आग लागल्याचे समजताच घटनास्थळी माजी सरपंच महेश कडू, सोनारी अध्यक्ष राकेश कडू, सरपंच पूनम कडू आणी सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते विकास कडू यांनी भेट देऊन पाहणी केली.
जेएनपीएकडुन प्रकल्पग्रस्तांना हे दिलेले स्टॉल असून 24 पैकी 20 स्टॉल जळून खाक झाले आहेत. 5 बाय 12 आकाराचे हे स्टॉल होते. सर्व दुकाने एकमेकांना लागून असल्याने तसेच दुकाने 30 वर्षांपूर्वी फायबरने बनविलेले होते. त्यामुळे आसपास एखाद्या सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली असेल, असे काही नागरीकांचे म्हणणे आहे.
आगीत आमच्या दुकानाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून आम्हाला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही जेएनपीटी प्रशासनाकडे मागणी केली आहे. झालेल्या नुकसान भरपाई व दुर्घटना संदर्भात आम्ही न्हावा शेवा पोलीस ठाणेशीसुद्धा संपर्क साधला आहे. आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा ही आमची विनंती आहे. -दत्तात्रेय कडू.नुकसानग्रस्त पीडित