Breaking News

पनवेल विभागात 2 एप्रिलला सावरकर गौरव यात्रा

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात गुरुवार (दि. 30)पासून भाजप आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार 2 एप्रिलला पनवेल परिसरात ही गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली.
मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रवक्ते प्रकाश बिनेदार, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, माजी खारघर शहर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिणीस दशरथ म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, अंजली इनामदार आदी पदाधिकार्‍यांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा प्रवास करणार आहे. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजप-शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने 2 एप्रिल रोजी खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल या भागात ही यात्रा गौरवरथाचा सहभाग घेऊन होणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला, तसेच सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी म्हंटले.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या उद्दिष्ठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे चालला आहे. आपल्या संस्कृतीचे महत्त्व जगात आहे. चीनला टक्कर देण्याची ताकद आपल्याकडे आहे. या आपल्या देशाचा गौरव जगभरात होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र परदेशात आपल्या देशाच्या विरोधात बोलतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी संघर्ष केला. दोन जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमान येथे तुरुंगवास भोगला. संघर्ष केला, त्यांच्या जाज्वल देशभक्तीचा कुणीच चॅलेंज करू शकत नाही. त्यांची देशभक्ती आणि कार्याविषयी विरोधकांकडून जाणीवपूर्वक संशय निर्माण केले जात आहे. हे हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्व अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध संस्था, संघटना, सार्वजनिक उत्सव मंडळ, पत्रकार, नागरिकांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

इंग्रजांचा छळ सहन करत असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. स्वातंत्र्य लढ्यासाठी सावरकरांनी त्याग दिले. राष्ट्रासाठी बलिदान देणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अवमान करण्याचे वारंवार काम राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी कौटुंबिक राजकारण व सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. त्यामुळे त्यांना महत्व काय कळणार?
-प्रथमेश सोमण, शिवसेना महानगरप्रमुख, पनवेल

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply