लाईनमनच्या उद्धट उत्तरांमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर
पनवेल : प्रतिनिधी
करंजाडे सेक्टर 2, 3, व 4 मध्ये चारदिवस रोज रात्री वीज जात आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी फोन केल्यावर लाईनमन म्हणतो झोप आता तुलाच त्रास होतो का? त्यामुळे मंगळवारी रात्री संतप्त नागरीक रस्त्यावर उतरले. पहाटे अधिकार्यांनी येऊन वीजपुरवठा सुरळीत केला.
करंजाडे परिसराला आवश्यक असलेली यंत्रणा येथील सब स्टेशनला आहे, पण येथील अभियंता कवटे यांनी वीजेचा आवश्यक दाब ठेवण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रोज रात्री वीज जाऊन नागरीक हैराण झाले होते. तक्रार केल्यावर लाईनमनची उध्दट उत्तरे यामुळे संतप्त नागरीक सरपंच मंगेश शेलार, भाजपचे उत्तर रायगड सरचिटणिस विनोद साबळे शहर अध्यक्ष मिहेंद्र शहारे, ग्रामपंचायत सदस्य अतिष साबळे, सुरज शेलार, शशिकांत शेळके यांचेसह रस्त्यावर आले.
महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर यांनी तेथे येऊन दूसरे अभियंता रणजीत देशमुख यांचेसह पहाणी करून वीजेच्या दाबाचे सेटींग वाढवल्यावर वीजआली. बुधवारी सकाळी लोकप्रतिनीधीनीं त्यांची कार्यालयात भेट घेऊन अभियंता कवटे यांचे दुर्लक्षामुळे वीज ग्राहकांचे नुकसान झालेच पण कंपनीची प्रतीमा ही खराब झाली असल्याने त्यांचेवर कारवाईची मागणी केली.
महावितरणचे अभियंता कवटे यांच्या दुर्लक्षामुळे अनेक नागरीकांच्या इलेक्टाँनिक्स वस्तूंचे नुकसान झाले. वर्क फॉर्म होम वाल्यांनाही त्याचा फटका बसला. त्यामुळे अशा अधिकार्याची तत्काळ बदली करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. -विनोद साबळे, भाजप उत्तर रायगड सरचिटणीस
सध्या आय.पी.एल मॅच संपल्यावर एकदम एसी सुरू होतात.त्यामुळे लोड वाढतो. त्यावेळी संबधीत कर्मचार्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आता तात्पुरते रणजीत देशमुख यांना आणून काम केले आहे त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. आम्ही लवकरच या भागाचा सर्वे करून योग्य त्या उपाय योजना करणार आहोत.
-देविदास बैकर, अतिरीक्त कार्यकारी अभियंता, महावितरण
RamPrahar – The Panvel Daily Paper