नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आर्थिक मदत केली. याबरोबरच शहीद जवानांसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची क्रिकेट मालिका जिंकायची आहे, असे शमीने म्हटले आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा शमीने तीव्र शब्दांत निषेध केला. तो म्हणाला, मी क्रिकेट खेळतो, पण माझा देश सीमेवरील जवानांमुळे सुरक्षित आहे. त्यामुळे गरज पडल्यास मी क्रिकेट सोडून देशसेवेसाठी लष्करात भरती होण्यास तयार आहे. भारत देशाच्या आणि माझ्या जवानांच्या रक्षणासाठी मी चेंडू सोडून हातात ग्रेनेडदेखील घ्यायला तयार आहे. मला शहीद जवानांसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकायची आहे आणि तो विजय त्यांना समर्पित करायचा आहे. दरम्यान, शहीद जवानांच्या पत्नींना देण्यात येणार्या आर्थिक सहकार्यामध्ये शमीने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.