मुंबई ः प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 12पैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत.
महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे (26 मते), परिणय फुके (26 मते), योगेश टिळेकर (26 मते), अमित गोरखे (26 मते), सदाभाऊ खोत (23 मते, दुसर्या पसंती क्रमांकाने विजयी); शिवसेनेचे भावना गवळी (24 मते) व कृपाल तुमाने (25 मते) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (23 मते) व शिवाजीराव गर्जे (24 मते) यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव (25 मते) आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर (22 मते, दुसर्या पसंती क्रमांकाने विजयी) निवडून आले, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष समर्थित शेकापचे जयंत पाटील यांना अवघी 12 मते पडल्याने पराभूत झाले.
आमदार संख्या कमी असतानादेखील महायुतीने बाजी मारली आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. या निवडणुकीत आघाडीची काही मते फुटली असून संशयाची सुई काँग्रेसवर आहे.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper