माफक दरात सेवा; नागरिकांची भागणार तहान
पनवेल : रामप्रहर वृत्त
नांदी व सनोफी फाउंडेशनच्या वतीने पनवेलजवळील करंजाडे येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आय प्युअर हा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 27) झाले.
स्वच्छ जल स्वस्थ कल ही संकल्पना राबवून नांदी फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभरात आय प्युअर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. करंजाडेमधील रहिवाशांना स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने नांदी व सनोफी फाउंडेशनने करंजाडे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हा प्रकल्प करंजाडे येथे सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्लांटमधून अवघ्या आठ रुपयांमध्ये 20 लिटर शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रथम एटीएमप्रमाणे कार्ड खरेदी करायचे आहे. या कार्डद्वारे 20 लिटर पाणी मिळणार असून ही सेवा 24 तास उपलब्ध राहणार आहे. कार्डमधील पैसे संपल्यावर पुन्हा रिचार्ज करायचे आहे. एखाद्याकडे कार्ड नसल्यास त्याला 15 रुपयात एक लिटर पाणी मिळेल, तर जिल्हा परिषद शाळांना पाणी मोफत दिले जाणार आहे. या प्रकल्पामुळे दोन महिलांना नोकरीची संधीही मिळणार आहे.
या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, उपाध्यक्ष नाथाभाई भारवड, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, वावंजे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, बिपीन गायकवाड, सूरज शेलार, प्रिया फडके, शिल्पा नागे, निशा गायकवाड, पूजा गायकवाड, नंदी फाउंडेशनचे मॅनेजर संतोष धुळगुडे, नागेश गोजे उपस्थित होते. या वेळी धुळगुडे यांनी या प्रकल्पाबाबत माहिती देत सात वर्षानंतर हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सांगितले.