वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत नियोजन आढावा बैठक
पनवेल : प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने 31 मे ते 2 जूनपर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मंदिरे बांधणे, जीर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते केली आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आध्यात्मिक उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. त्या संदर्भातील नियोजन बैठक शनिवारी (दि. 24) खांदा कॉलनी येथे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत झाली.
या बैठकीस भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, राजेंद्र पाटील, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कोकण दिंडीचे अध्यक्ष पद्माकरमहाराज पाटील, बाळामहाराज भोपी, भोईर महाराज, धाऊमहाराज पाटील, ह.भ.प. सुरेश पाटील, शंकरमहाराज सांगडे, म्हात्रे महाराज, काशिनाथमहाराज पारठे, निवृत्तीबुवा चौधरी, जनार्दन पाटील, ज्ञानेश्वरमहाराज शिंदे, वसंतशेठ पाटील, पुंडलिकमहाराज फडके, मधुकर भगत, वसंत ढवळे, चंद्रकला जायभाये, सुजाता साबळे, गीताताई पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकर सरपंच आनंद ढवळे, अनेश ढवळे आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखे दानशूर आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जिल्ह्यात दुसरे झाले नाही. त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष संपूर्ण वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त आध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला अशा क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येणार असून कीर्तन महोत्सव हा पहिला आध्यात्मिक कार्यक्रम असणार आहे. यामध्ये संगीत भजन, हरिपाठ, हरी कीर्तन आणि आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली.
मान्सूनपूर्व पाऊस आणि हवामान विभागाच्या सूचना लक्षात हा महोत्सव खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर निश्चित करण्यात आला असून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी 13 मुख्य समित्या स्थापन करण्यात आल्याचेही आमदार महेश बालदी यांनी सांगितले, तर अनंतामहाराज पाटील यांनी या कीर्तन महोत्सवासाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकातून दिली.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य अतुलनीय असे आहे. ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाची रेलचेल असावी अशी संकल्पना आमदार महेश बालदी यांनी मांडली. त्याची सुरुवात या कीर्तन महोत्सवाने अर्थात विठूरायाच्या नामस्मरणाने होणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रमे होणारच आहेत; त्याबरोबर भजन महोत्सवही आयोजित करणार आहोत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम वारकरी संप्रदायाने आपला स्वतःचा कार्यक्रम समजून हाती घेतला आहे. तुमच्या सर्वांच्या सहभागातून हा महोत्सव मोठा होणार असून या महोत्सवात सहभाग घेत आहात, त्याबद्दल ठाकूर कुटुंबाकडून मनस्वी आभार मानतो.
-आमदार प्रशांत ठाकूर
RamPrahar – The Panvel Daily Paper