लंडन : वृत्तसंस्था
जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात परदेशात वन डे मालिका विजयाचा पराक्रम केला आहे. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतच विजयी पताका फडकावेल असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे.
1983 आणि 2011 च्या वर्ल्ड कप विजयाची पुनरावृत्ती करण्याची कोहलीला संधी आहे. साउदम्प्टन येथे भारत पहिला सामना खेळणार आहे आणि त्यासाठी भारतीय संघ गुरुवारी रवाना झाला. प्रवासादरम्यान फिरकीपटू युजवेंद्र चहलने संघातील सदस्यांशी संवाद साधला. त्यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश होता. चहलशी संवाद साधताना 57 वर्षीय शास्त्री यांनी त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ग्लॅमोर्गन संघाकडून कौंटी क्रिकेटमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले होते आणि त्यांनी प्रवासादरम्यान या आठवणी सांगितल्या. त्या वेळी त्यांनी चहलला अभी तो मै जवान हूं! असे सांगितले.