Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मतभेद

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागावाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये, अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या 50 टक्के जागांची मागणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणार्‍या काँग्रेसला खिंडीत पकडण्याची राष्ट्रवादीची रणनीती दिसत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 टक्के जागावाटप असावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नव्हती.

त्यापूर्वी 2009 ची विधानसभा निवडणूक आघाडीत लढताना काँग्रेसने 169 तर राष्ट्रवादीने 119 जागा लढवल्या होत्या. मात्र आता 144-144 अशा 50 टक्के जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. ताकद नसतानाही मुंबईतही 36 पैकी निम्म्या जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत.

मागील विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी लढली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने 42 जागा जिंकल्या होत्या, तर 71 मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या होत्या आणि 56 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. त्यामुळेच समसमान जागा वाटपाच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे आघाडीत जागा वाटपावरून मतभेद होण्याची चिन्हे आहेत. जागावाटपाचा पेच झाल्याने आघाडीबाबत साशंकता आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply