निर्णय प्रक्रियेवरून विराट-रोहितमध्ये मतभेदाची चर्चा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान अखेरीस संपुष्टात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियात दोन गट पडले आहेत.
भारतीय संघातील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सध्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून, दुसरा उपकर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे कधीकधी एकमेकांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतात, ज्यामुळे संघात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यावरूनही असाच गोंधळ निर्माण झाल्याचे या खेळाडूने स्पष्ट केले आहे.
क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठिंबा आहे. याच कारणामुळे प्रक्षिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी झालेला वाद, आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती. खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या गटातील खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळते. लोकेश राहुलची कामगिरी कितीही खराब असली तरीही त्याचा सलामीवीर, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नेहमी विचार केला जातो. नाही तर किमान 15 जणांच्या संघात तरी राहुल आपले स्थान टिकवतोच. आयपीएलमध्ये एकाच संघात खेळत असल्यामुळे युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात असल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे.