Breaking News

वाकण-पाली-खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक वळवा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा आदेश

सुधागड-पाली ः बातमीदार

वाकण-पाली-खोपोली रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक वाकण- पेण-खोपोली अशी वळवली असून वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना व प्रवाशांना दिलासा दिला आहे. वाकण-पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर  प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वर्‍हाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील वर्‍हाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. जुने बांधकाम असल्याने व सद्यस्थितीत जुना व जर्जर झालेला हा पूल केव्हाही कोसळून सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती वर्तवली जात आहे. पाली-खोपोली मार्गावर असलेला वर्‍हाड येथील पूल अनेक गावांसह मुंबई, पुणे व मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा दुवा मानला जातो. या सर्व गंभीर बाबींचा विचार केला असता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक पेण वडखळमार्गे वळविल्याने प्रवासी वर्गातून व वाहनचालक यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या रस्त्याचे वेगाने होणारे नुकसान थांबेल व अपघातांनाही आळा बसेल. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला हवी, अशी येथील स्थानिक जनतेची अपेक्षा आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply