जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा आदेश
सुधागड-पाली ः बातमीदार
वाकण-पाली-खोपोली रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक वाकण- पेण-खोपोली अशी वळवली असून वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना व प्रवाशांना दिलासा दिला आहे. वाकण-पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वर्हाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील वर्हाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. जुने बांधकाम असल्याने व सद्यस्थितीत जुना व जर्जर झालेला हा पूल केव्हाही कोसळून सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती वर्तवली जात आहे. पाली-खोपोली मार्गावर असलेला वर्हाड येथील पूल अनेक गावांसह मुंबई, पुणे व मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा दुवा मानला जातो. या सर्व गंभीर बाबींचा विचार केला असता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक पेण वडखळमार्गे वळविल्याने प्रवासी वर्गातून व वाहनचालक यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या रस्त्याचे वेगाने होणारे नुकसान थांबेल व अपघातांनाही आळा बसेल. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला हवी, अशी येथील स्थानिक जनतेची अपेक्षा आहे.