इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राग आळवला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतील, आम्ही चर्चेस तयार आहोत, असा दावा इम्रान खानने केला आहे. इम्रान खान म्हणाले की, भारताने काल केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे, मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही.