Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कामं घेऊन जायचो, मात्र पदरी कायम निराशाच : उदयनराजे

सातारा ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सातारा येथे आज दुपारी आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली, तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपरिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही स्वागत करण्यात आले. या वेळी उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप केला. या वेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्षाच्या आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला. या वेळी भाजप प्रवेशानंतर प्रथमच जाहीर सभेत बोलताना उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुका पार पडून केवळ तीन महिनेच झालेले असताना खासदारकीचा राजीनामा का दिला? याबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार काळात जनतेची घेऊन गेलेली कामं कधीच झाली नाहीत. माझ्याकडून नेण्यात आलेल्या कामांच्या प्रस्तावांना कायम केराची टोपली दाखवली गेली, तरीपण मी 15 वर्षे सोबत होतो, खरंतर याबाबत राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता. शिवाय निवडणुकीत माझ्या मताधिक्क्यात झालेल्या घसरणीमुळे मी तो नैतिकदृष्ट्या माझा पराभव मानतो, असेही ते म्हणाले, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सरकारकडे कामं घेऊन गेलो, तर पदरी कायम निराशाच पडली. जी कामं झाली ते मी स्वतः रेटून केली असे सांगत, सत्तेत असताना एक रुपयाचेही काम झालं नसल्याचा त्यांनी आरोप केला.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply