खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शुक्रवारी (दि. 15) पहाटे एका रिक्षेचा गंभीर अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी आहे. त्याला खोपोलीत उपचारानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खंडाळ्याकडून खोपोलीच्या दिशेने रिक्षा येत असताना बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळच्या अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेच्या डोंगरावर आपटून उलटली. या गंभीर अपघातात बालाजी विजेंद्र राव आणि मच्छिंद्र संभाजी काळे यांचा गंभीर दुखापत व अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला, तर चालक गणेश चव्हाण हा रिक्षेत अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आले. प्रथम त्याला खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त तिघे नेरूळ येथील रहिवासी असून ते मित्र आहेत. खंडाळा येथे काही कामानिमित्त ते आले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास परतत असताना त्यांच्या रिक्षेला अपघात झाला. या अपघाताबाबत खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper