Breaking News

अंडर 19 वर्ल्डकप : टीम इंडियाची घोषणा

प्रियम गर्गकडे नेतृत्व; संघात तीन मुंबईकर

मुंबई : प्रतिनिधी

पुढील वर्षी होणार्‍या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून, या संघात यशस्वी जयस्वाल आणि अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या तीन मुंबईकर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने संघाची घोषणा केली. 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चार गटांत ही स्पर्धा होईल.

स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व प्रियम गर्गकडे सोपविण्यात आले आहे. भारत अ गटात खेळणार आहे. त्यात पहिल्यांदा पात्र ठरलेल्या जपानसह न्यूझीलंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीग फेरीसाठी पात्र ठरतील.

भारतीय संघाने चार वेळा अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. 2018मध्ये स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला होता.

त्यामुळे भारतीय संघासमोर विश्वविजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.

असा आहे संघ

यशस्वी जयस्वाल (मुंबई), तिलक वर्मा (हैदराबाद), दिव्यांश सक्सेना (मुंबई), प्रियम गर्ग (कर्णधार, यूपी), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेटकीपर, यूपी), शाश्वत रावत (बडोदा), दिव्यांश जोशी (मिझोराम), शुभांग हेगडे (कर्नाटक), रवी बिश्नोई (राजस्थान), आकाश सिंह (राजस्थान), कार्तिक त्यागी (यूपी), अथर्व अंकोलेकर (मुंबई), कुमार कुशाग्र (विकेटकीपर, झारखंड), सुशांत मिश्रा (झारखंड), विद्याधर पाटील (कर्नाटक).

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply