Breaking News

‘जैश’चे देशात अस्तित्वच नाही

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश ए मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्तान लष्कराने उलट्या बोंबा मारत ‘जैश ए मोहम्मद’ ही संघटना आमच्या देशात अस्तित्वातच नाही, असं म्हटलं आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर हा पाकिस्तानात आजारी असल्याचं पाकिस्तानच्याच परराष्ट्रमंत्र्यांनी यापूर्वी मान्य केले. आता पाकिस्तानी लष्कर मात्र ही दहशतवादी संघटना आमच्या देशात अस्तित्वातच नाही, असे म्हणत आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी चारच दिवसांपूर्वी एका मुलाखतीत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर आजारी असल्याचं सांगितलं होतं. मसूद अझर मारला गेल्याचे वृत्त जेव्हा काही प्रसारमाध्यमांमध्ये आले होते तेव्हा पाकिस्तानचे सांस्कृतिक मंत्री फैय्याज उल हसन यांनीही मसूद जिवंत असल्याची माहिती दिली होती. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावर दबाव वाढतो आहे. हाफिज सईद या दहशतवाद्याच्या दोन संघटनांवरही पाकिस्तानने बंदी घातली आहे. पाकिस्तान भारताच्या कुरापती काढण्याचे धोरण थांबवत नसल्यानेच पुलवामा येथील हल्ल्यानंतर हवाई हल्ला करून भारताने चोख प्रत्युत्तर दिले. तरीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि भ्याड हल्ले सुरूच आहेत. आता पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने जैश ए मोहम्मद ही संघटना पाकिस्तानात अस्तित्वातच नाही, असा दावा केला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply