मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बोलताना सांगितले की, अत्यंत आश्चर्यकारक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतले पाहिजे. यामधून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होतो आहे. विचारधारा, तत्व, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळे आहे का? असे सवाल करीत एकदा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
जे. पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, अमित शाह यांच्या नेतृत्वात पक्षाने खूप मोठा विस्तार केला. अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली. केंद्रात दोन वेळा मोदी सरकार आले. नड्डा यांची सामान्यांशी नाळ जुळलेली आहे. कार्यकर्त्यापासून त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास आहे. त्यांच्या नेतृत्वातही भाजप वेगाने पुढे जाईल.
सरकारमुळेच शिर्डी-पाथरी वाद
साईबाबा हे सगळ्याचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्याभोवती असा वाद होणे दुर्दैवी आहे. सरकारमुळेच हा वाद निर्माण झाला आहे. सरकारने पुढाकार घेऊन वादावर तोडगा आणला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper