उद्धव ठाकरेंनी प्रकल्पाविषयी बोलणे टाळले
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रोत्सवाला सोमवारी (दि. 17) उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार प्रकल्पाविषयी काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती, पण ते काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.
राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणार्या नाणार प्रकल्पाला टोकाचा विरोध केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणात नाणारच्या विरोधात प्रचार करून मते मागितली. निवडणूक वचननाम्यातही नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते, मात्र शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ’सामना’त नाणार प्रकल्पाची भलामण करणारी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे राज्यात आघाडी सरकारमध्ये सामील होताच शिवसेनेने नाणारवरून भूमिका बदलल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी जिल्हा दौर्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाणार प्रकल्पाविषयी बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ते या विषयावर काही न बोलताच पुढे रवाना झाले.