
कर्जत : प्रतिनिधी
हल्ली स्तुती करण्यापेक्षा निंदा करण्याकडे जास्त कल असतो. जो श्रेष्ठ आहे, त्याच्या पायी नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसर्याचे कौतुक करायला शिकतो, तेंव्हा माणसाची मोठे होण्याची सुरुवात होते, असे प्रतिपादन एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांनी येथे केले. भागवत धर्म सेवा मंडळ व मोठे वेणगाव (ता. कर्जत) ग्रामस्थ यांच्या विद्यमाने वै. हभप जगन्नाथ महाराज पवार यांच्या प्रेरणेने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सावात गोसावी महाराजांनी ’शरण शरण एकनाथा…‘ या तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन सेवा दिली. त्यात ते बोलत होते. संतांना दिलेल्या उपमा इतर कोणत्याही सामान्य माणसाला देणे हा एक प्रकारे तो संतांचा अपमान आहे. आजवर हजारो कीर्तनकार झाले आहेत, परंतु समाजामध्ये वाईट गोष्टी वाढतच चालल्या आहेत. त्या मगच एकच कारण म्हणजे जो सांगणारा आहे, तो तसे आचरण करीत नाही, असे गोसावी महाराजांनी स्पष्ट केले. अभंगाचे गायन दीपक लोभी आणि महेश देशमुख यांनी केले. सुरेश फराट यांनी मृदुंगावर तर बाळकृष्ण रुठे यांनी संवादिनीवर साथ संगत दिली. नितीन गवसकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper