अलिबाग : प्रतिनिधी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांना झालेल्या मारहाणीमुळे रायगड जिल्हा परिषदेचे प्रशासन हादरून गेले आहे. सर्व अधिकार्यांनी धसका घेतला आहे. आता सर्व प्रमुख अधिकार्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विचार गांभीर्याने सुरू झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. 13) जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकार्यांची बैठक झाली.
रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच रोहा येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव छापले नाही, म्हणून जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या प्रतोद मानसी दळवी यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांच्या दालनात जाऊन त्यांना मारहाण केली होती.
या घटनेनंतर ओसवाल अजूनही कार्यालयात आलेले नाहीत. त्यांनी जिल्हा परिषद प्रशासन, अधिकार्यांची संघटना किंवा पोलिसांतही तक्रार केली नाही. केवळ ओसवालच नाही तर रायगड जिल्हा परिषदेतील अन्य अधिकार्यांनीदेखील या घटनेचा धसका घेतला आहे.
मारहाण झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकरी जयस्वाल यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन अधिकार्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ओसवाल यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे मारहाणीचे पुरावे कुणाकडे नाहीत. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
सर्व अधिकार्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आग्रही आहेत. यासंदर्भात काय करता येईल, याबाबत हळदे यांनी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांशी बुधवारी चर्चा केली.