पनवेल : वार्ताहर
आज जगभरात व आपल्या देशामध्येही कोरोनासारख्या महारोगराईने थैमान घातले आहे. पनवेलमध्ये ही काही प्रादुर्भाव झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन गरजे खातर त्यांना दूध, फळे, भाजीपाला सारख्या गोष्टी खरेदी करण्यासाठी घरा बाहेर पडावे लागत आहे. ही बाब भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी मंगळवारी (दि. 31) सारस्वत बँकेजवळ, स्वामी नित्यानंद मार्ग येथे बाजारातील गर्दी टाळण्यासाठी रास्त भावात भाजी विक्री केंद्र सुरू केले. पहिल्याच दिवशी राहिवाश्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून येथील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले. या भाजी विक्री केंद्र चालू करण्यामागील हेतू स्पष्ट करताना नितीन पाटील यांनी सांगितले की, या संकल्पेमुळे भाजी मार्केट यार्ड येथे होणारी गर्दी कमी होण्यास मदत तर होईलच, तर नागरिकांना गर्दी मुळे होणार्या करोनासारख्या संसर्गजन्य रोगापासून दूर रहाण्यास मदतच होईल. हे केंद्र रोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळातच खुले राहणार आहे तरी सर्व नागरिक/रहिवाश्यांनी सदर वेळात भाजी खरेदी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.