कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजप-शिवसेना युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसर्यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. भाजपचे सर्व नेते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकार्यांनी युती धर्माचे पालन करावे. जोमाने प्रचार करून युतीचा उमेदवार खासदार केला पाहिजे, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हॉटेल पॅव्हेलियनमध्ये बैठक झाली. पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण विभागाच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडले होते याची आठवण करून देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजप शिवसेना युतीचा खासदार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवार कोण आहे याचा विचार न करता शिवसेनेचा प्रचार करायचा आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात युतीला आघाडी मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडून मदत मिळाली नाही, अशी कारणे न सांगता मिळेल ती साधने उपलब्ध करून प्रचार करावा. बैठकीला आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, वस्त्रोद्योगमहामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, गोकुळचे संचालक बाबा देसाई, गोपाळराव पाटील, राहुल देसाई, मकरंद देशपांडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अॅड. संपतराव पवार यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper