नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत सध्या कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. तर अद्यापही शासनाने आवाहन करून नागरिक बेशिस्तपणे वागून घराबाहेर पडत आहेत. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागात अशी परिस्थिती जास्त प्रमाणात आढळून येते. ही बाब लक्षात घेत पालिकेने झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून गणल्या जाणार्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ते थांबवणे शासनाला जमलेले नाही. बाधितांचा आकडा या भागात वाढत आहे. नवी मुंबई महापालिकेत देखील अनेक भागांत झोपडपट्ट्या आहेत. एका घरात अनेकजण राहत असल्याने व उकाडा प्रचंड वाढल्याने नागरिक सतत घराबाहेर पडत असतात. त्यात झोपडपट्टी भागात सामाजिक संस्था अन्नधान्य वाटप करत असल्याने ते घेण्यासाठी तरी नागरिकांना घराबाहेर यावे लागते. त्यामुळे पालिकेने आशा तुर्भे, दिघा, नेरुळ, महापे, राबाळे, ऐरोली सारख्या झोपडपट्टी भागांतील मुख्य रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारल्यास येणारा व जाणारा प्रत्येक नागरिक सॅनिटायझ होऊन जाईल. अन्यथा या भागांत कोरोनाचा कहर झाल्यास बाधितांचा आकडा वेगाने वाढण्याची शक्यता आहे. पालिकेने या बाबीचा विचार केल्यास झोपडपट्टी क्षेत्रातील भाग कोरोनापासून वाचण्यास मदत होईल, असे देखील गोविंद साळुंखे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.