मुंबई : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) आजही मुंबईत शक्य आहे आणि आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला, पण आज जे गळे काढून ओरडत आहेत त्यांनी 2007 ते 2014 या काळात काय केले याचे उत्तर आधी दिले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.
फडणवीसांनी पुढे सांगितले की, उच्चाधिकार समितीने 2007मध्ये मुंबईत आयएफएससीच्या स्थापनेबाबत अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता. 2014पर्यंत तेव्हा ना महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे प्रस्ताव सादर केला ना केंद्रातील सरकारने विचार केला.
2007मध्ये व्हायब्रंट गुजरात समिटच्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादला आयएफएससी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनासाठी ईसीआयडीआयची नियुक्ती केली. 2012पर्यंत गुजरात आयएफएससीचे सर्व आराखडे तयार झाले आणि कामालाही प्रारंभ झाला. 2015मध्ये केंद्र सरकारने आयएफएससीसंदर्भात एसईझेडच्या कायद्यात बदल केल्यानंतर गिफ्टसिटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याचवेळी मुंबईचा प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आला. अहमदाबादचा प्रस्ताव बर्याच बाबींची पूर्तता करीत पुढे गेल्याने त्याला मंजुरी मिळाली आणि 50 हेक्टर जागेमुळे बीकेसीच्या प्रस्तावात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यावरही सल्लागारामार्फत तोडगा शोधून पुन्हा हा प्रस्ताव फेरसादर करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते, असा टोलाही या वेळी फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper